पोरी गरिबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका... गौरी पालवेंच्या अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीतच वडिलांचा आक्रोश

Foto
अहिल्यानगर: भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नी गौरी पालवे यांनी रविवारी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. अनंत गर्जे यांच्यासह सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळामुळेच गौरी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या व्यक्तींनी केला होता. त्यानंतर आज डॉ. गौरी पालवे यांचे पार्थिव अनंत गर्जे याच्या मूळ गावी मोहोज देवढे येथे नेण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. गौरी यांच्या माहेरच्या मंडळींनी पती अनंत गर्जे याच्या घरासमोर अंत्यसंस्काराची मागणी केली, पण गर्जे कुटुंबाने याला विरोध केला. यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुलीला अखेरचा निरोप देताना गौरी यांच्या वडिलांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थित सर्वच स्तब्ध झाले.

तुम्हाला मुली असतील तर त्या गरिबाला द्या. श्रीमंतांच्या नादी लागू नका, त्यांच्या भपक्यावर जाऊ नका, असे म्हणत गौरी पालवे यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या वडिलांनी आपल्या भावना मांडल्या. तसंच यावेळी पोलिसांसमोरही त्यांनी न्यायासाठी हंबरडा फोडला. तुम्हाला मुली असतील तर माझ्या मुलीला न्याय द्या, असे ते म्हणाले.

 दरम्यान, गौरी पालवे यांच्या माहेरच्या लोकांनी डॉ. गौरी यांनी पतीकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी मात्र या आरोपांवर अधिकृत भाष्य केलेलं नाही. सध्याच्या तणावामुळे डॉ. गौरी पालवे यांच्यावर अहिल्यानगर पाथर्डी येथेच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे याच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य महिलेसोबतचे संबंध उघड झाल्याने अनंत आणि त्याचे कुटुंबीय गौरीला त्रास देत होते, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात अनंत आणि गौरी यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर त्या वरळी येथील नवीन बीडीडी वसाहतीत राहत होत्या. गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी दिलेल्या जबाबात म्हटलंय की, शनिवारी सायंकाळी अनंतने फोन करून सांगितलं की, गौरी आत्महत्या करायला निघाली आहे, तिला समजवा. काही वेळातच त्याने पुन्हा फोन करून गौरीच्या मृत्यूची बातमी दिली. लग्नानंतर काही दिवसांनी गौरीच्या हाती काही कागदपत्रे लागली. ती लातूर येथील ममता रुग्णालयाची होती. त्यात एका गर्भवती महिलेचे नाव होते आणि त्या महिलेच्या नावापुढे अनंत गर्जे यांचा पती म्हणून उल्लेख होता. यावरून अनंत यांचे त्या महिलेसोबत आधीच लग्न झाले होते किंवा प्रेमसंबंध होते, हे स्पष्ट झाले. गौरीने याबद्दल अनंतला जाब विचारला असता, त्याने तिला धमकावले, असा आरोप पालवे यांनी केला आहे.

दरम्यान, वडिलांनी केलेल्या आरोपावरून वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांच्या विरोधात पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. शवचिकित्सा अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत पालवे कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनंत यांच्यासह त्यांचा भाऊ अजय आणि बहीण शीतल गर्जे आंधळे यांनाही आरोपी करण्यात आलं आहे.